पुणे

कांदा लागवड अंतिम टप्प्यात; पारगाव परिसरातील चित्र

अमृता चौगुले

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : बेगाव पूर्व भागात रब्बी हंगामातील कांदा लागवडी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यंदा कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडे कांदा रोपे मुबलक प्रमाणात होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोपे उरली आहेत. अनेक शेतकर्‍यांनी रोपे सोडून दिली आहेत. काहींनी रोपांवर रोटर फिरवण्यास सुरुवात केली आहे. रब्बी हंगामात कांदा लागवडी मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. त्यासाठी शेतकरी बी आणून शेतामध्ये रोपे तयार करतात. दरवर्षी शेतकर्‍यांना लागवडीसाठी रोपांचा तुटवडा भासतो.

गतवर्षी परतीच्या पावसाचा फटका रोपांना बसला होता. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची रोपे सडून नष्ट झाली होती. त्यामुळे लागवडीवेळी रोपांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. यंदाही परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शेतकर्‍यांनी कांदा रोपे मोठ्या प्रमाणावर तयार केली. मात्र, आता लागवडी अंतिम टप्प्यात आल्याने शेतकर्‍यांकडे रोपे मुबलक प्रमाणात शिल्लक आहेत.

यंदा रोपनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च
शिल्लक रोपांचे करायचे काय ? असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. यंदा कांदा रोपांसाठी शेतकर्‍यांनी मोठे भांडवल गुंतवले. रोपांवर वेळोवेळी महागड्या औषधांच्या फवारण्या केल्या. तुषार सिंचनाचाही वापर केला होता. मात्र, आता बहुतांश शेतांमध्ये कांदा रोपे शिल्लक असलेली दिसून येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT