निमोणे: नाशिकचा तथाकथित भोंदू बाबा कॅप्टन खरात याने श्रद्धेच्या नावाखाली मांडलेला लुटीचा बाजार नुकताच पोलीस तपासात उघड झाला आहे. लाखात एक चिंचोका विकणे, 9 लाखांना साधा मध विकणे आणि कवडीमोलाचे खडे लाखांच्या घरात भक्तांच्या माथी मारणे, अशा खरातच्या अजब ‘लीला’ पाहून समाज सुन्न झाला आहे. मात्र, केवळ खरातच नव्हे, तर ग््राामीण भागातही कुलधर्म आणि कुलाचाराच्या नावाखाली सामान्यांचे प्रचंड आर्थिक शोषण होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
ग््राामीण भागात ‘अंगात येणे’ आणि त्यानंतर ‘गुरू’ करण्याची परंपरा जुनीच आहे. पूर्वी हे विधी भाजी-भाकरीच्या नैवेद्यात पार पडायचे; मात्र, आता या क्षेत्रालाही व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. शिष्याला देवीचे माहात्म्य सांगणाऱ्या गुरूंची दक्षिणा आता हजारांच्या घरात गेली आहे. एवढ्यावरच समाधान न मानता, ‘आई तुझी परीक्षा घेतेय, माझ्या देव्हाऱ्यातील देवीला तोळ्याचा दागिना कर,’ अशी थेट मागणी आता उघडपणे केली जात आहे. या विळख्यात अडकलेला बहुतांश वर्ग हा अल्पशिक्षित आणि कष्टकरी आहे. कुटुंबाला सुख मिळावे, मुलाबाळांचे कल्याण व्हावे किंवा ‘केली-करणी’ची बाधा टळावी, या भीपोटी हा वर्ग ऐपत नसतानाही कर्ज काढून हे विधी पूर्ण करतो. अनेकदा चढ्या दराने सावकाराकडून पैसे घेऊन गुरूंचे खिसे भरले जातात. ‘देवकार्य’ असल्याने या शोषणाविरुद्ध कुणी ब काढायलाही तयार होत नाही.
वेळीच सावध होण्याची गरज
अवास्तव मागणी : जर कोणताही गुरू किंवा महाराज पैशांची किंवा सोन्या-नाण्याची मागणी करत असेल, तर ती भक्ती नसून व्यवसाय आहे हे समजावे.
भीतीचा व्यापार : करणी-बाधेची भीती घालून विधी करायला लावणे हा शोषणाचा मार्ग आहे.
शिक्षण महत्त्वाचे : शिकले-सवरलेले लोकही अशा जाळ्यात अडकणे ही चिंतेची बाब आहे. विज्ञानाची कास धरून श्रद्धेची चिकित्सा करणे काळाची गरज आहे.