पुणे; पुढारी वृत्तसेवा : एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस अशा विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) घेण्यात येणारी नीट प्रवेश परीक्षा रविवारी पुण्यासह राज्यात सुरळीत पार पाडली. एनटीएने दिलेल्या सूचनांचे पालन करून विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील विद्यार्थी पालकांसह परीक्षेला हजर होते. त्यामुळे परीक्षा संपेपर्यंत पालक परीक्षा केंद्रावर बसले होते.
काही पालकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. नीट परीक्षेचे नियोजन दुपारी 2 ते 5 वाजून 20 मिनिटे या कालावधीत करण्यात आले. या परीक्षेसाठी देशातील 18 लाख 72 हजार 341 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी साधारण साडेसतरा लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदाची परीक्षा ही पुण्यासह देशातील 499 शहरांमध्ये पार पडली, तर परदेशातील 14 परीक्षा केंद्रांवरही परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.