पुणे : मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात दर वर्षीप्रमाणे वेळेतच होईल. परंतु, अल निनोच्या प्रभावामुळे त्याचे वितरण मात्र विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
यंदा एप्रिलचा पहिला आठवडा अवकाळी पावसाचा ठरला. महाराष्ट्रातील अनेक भागांत गारपिटीसह पावसाने शेतकर्यांचे नुकसान झाले. तसेच एप्रिलमध्ये 112 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. त्यामुळे याचा परिणाम मान्सूनच्या आगमनावर होईल, असे तर्कवितर्क सुरू झाले. यात लाईट फॉल कमी असणे, उन्हाची तीव्रता कमी, वार्याचा वेग जास्त, हिंदी महासागर अन् अरबी समुद्राचे तापमान यावरही चर्चा सुरू आहेत.
मान्सून वेळेतच, पण...
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, केरळमध्ये 1 ते 3 जून, तर महाराष्ट्रात ते 10 जून उजाडेल. वितरण मात्र विस्कळीत राहील. अल निनो स्थितीचा परिणाम ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान दिसू शकतो.
एप्रिलमधील अवकाळी पावसाचा परिणाम मान्सून लांबण्यावर होणार नाही. मान्सून वेळेवरच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही. मात्र, याचा सविस्तर अंदाज मे महिन्यात येईल.डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ, पुणे