सासवड: पुरंदर तालुक्यातील सर्व गावे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणार असल्याची माहिती पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली आहे.
विजय शिवतारे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत केलेल्या मागणीला मोठे यश आले आहे. यापूर्वी पुरंदर तालुक्यातील 37 गावे पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात तर उर्वरित गावे ही प्राधिकरणाबाहेर होती. (Latest Pune News)
आ. शिवतारे म्हणाले, पुरंदर तालुक्यात एकूण 104 महसुली गावे आहेत. याशिवाय दोन ब वर्ग नगरपालिका आहेत. तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, रिंगरोड आणि आयटी पार्क असे अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. याशिवाय तालुक्यात जेजुरीचे खंडोबा मंदिर, पुरंदर किल्ला, नारायणपूरचे दत्त मंदिर, केतकावळे येथील प्रतिबालाजी मंदिर, वीर आणि कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, भुलेश्वर मंदिर अशी तीर्थ व पर्यटनक्षेत्रे येतात.
त्यामुळे पुणे शहरात समाविष्ट इतर गावांमध्ये ज्या पद्धतीने नियोजनाअभावी बकालपणा वाढला तशी स्थिती पुरंदर तालुक्यात निर्माण होऊ नये आणि आखीव-रेखीवपणे शहरे आणि गावे विकसित व्हावीत यासाठी एकाच नियोजन प्राधिकरणाच्या छताखाली सर्व तालुका आणला जावा, अशी मागणी मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
याबाबत पीएमआरडीएने शासनाला सकारात्मक अहवाल पाठवला असून सर्व गावे पीएमआरडीएच्या अखत्यारीत आणण्यासाठी नगरविकास विभागाकडून तयारी सुरू आहे. तालुक्यात यापुढे सर्वत्र रस्ते, गटर व अन्य पायाभूत सुविधा या नियोजनबद्धरीत्या उभारल्या जातील.
तालुक्यात येणारे सर्व प्रमुख रस्ते, सर्व गावांना जोडणारे रस्ते, वाड्या-वस्त्यांवर जाणारे रस्ते आणि गावांतर्गत रस्ते अशा सर्व रस्त्यांचा भविष्यात कायापालट केला जाईल. मधल्या काळात रिंगरोडच्या सभोवती येणारी 23 गावे ही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आली आहेत. त्यामुळे याबाबत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर पुढील निर्णय घेतले जातील.
पुरंदरची मुंबई करण्याचा शब्द खरा होणार...
सन 2009 मध्ये मी पहिल्यांदा निवडणूक लढताना ‘आता मुंबईत जाण्याऐवजी पुरंदरचीच मुंबई करूयात’ असं म्हटलं होतं. त्यावेळी अनेकजण माझ्या या आत्मविश्वासावर हसले. आज पुरंदर तालुका हा पुणे, मुंबई होण्याच्या दिशेने झेपावतोय. विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे येणारी गुंतवणूक, वाढणारे नागरीकरण आणि भविष्यात होऊ घातलेल्या विकासाला साजेशी अशी शहरे व गावे उभारणे हे एक स्वप्नवत काम आहे. माझे शब्द खरे होण्याची प्रक्रिया सुरू आहे असा विश्वास यावेळी शिवतारे यांनी व्यक्त केला.