खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका तीन दिवसांपूर्वीच पार पडल्या. त्यामध्ये शेतकर्यांनी आमची कामे पाहूनच भरघोस मतांनी विजयी केले, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मात्र, यादरम्यान विरोधकांनी माझ्या व्यक्तिगत जीवनाबद्दल, शिक्षणाबद्दल बोलून आपले अज्ञान दाखवून दिले आहे. अगदी खालच्या पातळीवर जाऊन बोलणे हे खेदजनक आहे.
परंतु, मी अजूनही संयम पाळला आहे. पण, जर का माझा संयम सुटला, तर तुम्ही इथे कुठेही दिसणार नाहीत, कातालाही दिसणार नाही, याची जाणीव त्यांनी ठेवावी, असे विधान भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले. वेळू (ता. भोर) येथे वृंदावन गार्डन लोकार्पण सोहळा व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
त्या वेळी आ. थोपटे बोलत होते. याप्रसंगी पोपट सुके, शैलेश सोनवणे, दिनकर धरपाळे, शिवनाना कोंडे, विठ्ठल आवाळे, सरपंच ईश्वर पांगारे, उपसरपंच सुजाता खुंटे, माजी सरपंच ज्ञानेश्वर पांगारे, अमोल पांगारे, आप्पा धनावडे, तसेच जीवन धनावडे, मंगेश सुर्वे, ग्रामसेवक उल्हास कोरडे आदी या वेळी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणार्यांसोबत ज्यांनी निवडणूक लढविली त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे भविष्यात तरी ते आमच्या नादी लागणार नाहीत. तुम्ही जनतेची कामे केली, तर जनता तुम्हाला डोक्यावर घेते, हे 18/0 या निकालातून दिसून आले आहे. जनतेला गृहीत धरले तर पानिपत होते, असा सल्ला नवनिर्वाचित संचालकांना त्यांनी दिला.
पूर्वी तांदूळ बाजार आपल्याकडे भरत होता. मात्र, काहींनी त्यामध्ये चुका केल्याने तो बंद झाला. मात्र, आता बाजार समितीमार्फत शेतकर्यांकडून तांदूळ खरेदी करून त्यांना एक चांगला हमीभाव देण्याचा मनोदय आहे. या वेळी गावामध्ये ज्या समस्या आहेत त्याची कामे मार्गी लागतील, असेही थोपटे यांनी सांगितले.