खोर (दौंड, पुणे), पुढारी वृत्तसेवा: दौंड तालुक्यातील कानगाव व कडेठाण येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केली.
आमदार कुल म्हणाले की, केंद्र शासनाच्या सुवर्ण चतुर्भुज योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने गोल्डन चतुर्भुज आणि डायगोनल स्कीमवरील सर्व मानवयुक्त रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेचे भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी आधीच संमती दिली आहे. या योजनेंतर्गत दौंड तालुक्यातील कडेठाण व कानगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेच्या भुयारी मार्गाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. परंतु, या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आणि नजीक असलेल्या कालवा फाट्यामुळे या भुयारी मार्गामध्ये सतत पाणी साचते व ते बाहेर पडू शकत नाही.
विशेषतः पावसाळ्यात असे दिसून आले आहे की, या भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्याने बराच काळ हा भुयारी मार्ग कार्यान्वित होऊ शकत नाही आणि भुयारी मार्ग पाण्याने भरला असल्याने गेली दोन वर्षे होऊनदेखील उर्वरित काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कडेठाण व पाटस रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात यावा, असे आ. राहुल कुल म्हणाले.
समुद्रात जाणारे 187 टीएमसी पाणी वळवून विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणारे मुळशी (टाटा) धरणाचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना दिले, तर त्याठिकाणी नक्कीच क्रांती घडू शकेल. त्यामुळे मुळशी धरणाचे पाणी नैसर्गिक पूर्वेकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आ. कुल यांनी केली. यामध्ये समिती तयार करण्यात आली असून, समितीचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्याबाबत देखील तातडीने निर्णय घ्यावा तसेच शेतकर्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज देण्यात यावी, अशी मागणी आमदार कुल यांनी विधानसभेत केली.