अजय कांबळे
कुरकुंभ: मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांबाबत स्थानिक प्रशासनासह थेट केंद्रीय रस्ते विकासमंत्री यांच्यापर्यंत पाठपुरावा केला. मात्र, अजूनही शेतकरी व नागरिकांच्या पदरी निराशाच आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी अणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार, असा संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे.
दौंड तालुक्यात मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्ग करताना दूरदृष्टीचा विचार व योग्य नियोजन अभाव दिसून येत आहे. हा रस्ता महामार्ग होऊन सात वर्षे उलटून गेले. लहान-मोठ्या अशा कोणत्याही समस्यांकडे लक्ष दिले जात नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अतिक्रमण काढणे, प्लॅन व नियमांनुसार रस्ता करणे, सुरक्षित प्रवास, नागरिकांची सुरक्षितता अशा वेगवेगळ्या मुद्यावर स्थानिक नागरिकांनी विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी धरणे आंदोलन, मोर्चे काढून विविध मागण्यांचे निवेदन दिले. मात्र, त्यातून काहीही हाती लागले नाही.
कुरकुंभ घाट परिसरातील अविश्री बाल सदन अनाथाश्रमाकडे जाण्यासाठी कसरत करून तीस ते चाळीस फूट खाली जावे लागते. तिथेही अद्याप रस्ता केला नाही. कुरकुंभ-दौंड रस्त्यालगत भागवतवस्तीसह अन्य ठिकाणी महामार्गाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. या घाटाच्या परिसरात पथदिव्यांची गरज आहे. या महामार्गालगत मोठ्या प्रमाणात शासनाच्या जमिनी आहे. या भागाच रस्ते अरुंद ठरत आहेत. त्यामुळे एका लेनमधून अवजड वाहनला दुसरे वाहन त्यास ओव्हरटेक करू शकत नाही.
महामार्गालगत अनेक शाळा असून, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने याठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सेवा रस्ता नसल्याने वाहने सरसकट धावतात. दोन, तीन, चार रस्ते एकत्रित येतात, तिथे वाहनचालक गोंधळून जातात. अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी अपघात वाढत आहे. येथे सहा महिन्यांत एक अल्पवयीन मुलगी, तसेच एक महिला मृत्युमुखी पडली. अनेक जण जखमी होतात. खेदाची बाब म्हणजे अडीअडचणीसंदर्भात केलेल्या तक्रारीला थेट केराची टोपली दाखवली जाते. त्यामुळे समस्या सोडविणे लांबच उलट समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कुरकुंभ दौंड रस्त्यालगत आमची शेतजमीन आहे. त्यावर उदरनिर्वाह चालू आहे. येथील रस्ता उंच झाल्याने शेती तीस ते चाळीस फूट खाली गेली आहे. तिथे अद्याप रस्ताच केला नाही. मातीच्या भरावावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे शेतमालाची वाहतूक करताना अडचणी येतात. येथे भुयारी मार्ग करावा, अशी मागणी केली. याबाबत रस्ते विकास महामंडळ व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पत्रव्यवहार केला आहे.उदय पाटील, शेतकरी