10 वर्षांनंतरही माळीणवासीय भीतीच्या सावटाखाली; जोरदार पाऊस पडला की रात्र काढतात जागून Pudhari
पुणे

Malin Landslide: 10 वर्षांनंतरही माळीणवासीय भीतीच्या सावटाखाली; जोरदार पाऊस पडला की रात्र काढतात जागून

कुटुंबाची कुटुंबे पडली होती मृत्युमुखी

पुढारी वृत्तसेवा

अशोक शेंगाळे

भीमाशंकर: 30 जुलै 2014 हा दिवस आठवला की अंगावर शहारे येतात. एका क्षणात सोन्यासारखे गाव मातीमोल झाले. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील माळीण दुर्घटनेस यंदा 10 वर्षे पूर्ण होत आहेत.

मात्र, आजही येथील नागरिक त्या भयातून बाहेर पडलेले नाहीत. जोरदार पाऊस पडला, तर रात्र जागून काढाव्या लागतात. जुनी भयान घटना पुन्हा डोळ्यांसमोरून जाते. आता येथे सोयीसुविधा असल्या, तरी मन रमत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. (Latest Pune News)

जुने माळीण गाव हसते-खेळते होते. तेथे अनेक लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. मात्र, 30 जुलैला पावसाने कहर केला. त्यात गावाचे होत्याचे नव्हते झाले. माळीण गाव एका क्षणातच मातीखाली गाडले गेले. त्यात आबालवृद्धांवह 151 जणांचा मृत्यू झाला. विविध कारणांसाठी गावाबाहेर असलेले काही लोक नशिबाने वाचले.

यात कोणी आई, वडील, बहीण, भाऊ, मुले तर कोणी संपूर्ण कुटुंबच गमावले आहे. नाती-गोती तुटली. गावातील काही जिवंत राहिलेल्या लोकांनी सार्‍या जखमा सावरत नवीन माळीण पुन्हा उभे केले आहे. आता पुनर्वसनानंतर नव्या ठिकाणी राहत असलो, तरी मनातील भीती व काळजावर झालेला घाव आजही जसाचा तसा असल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करतात. आत्ताच्या नवीन गावठाणातील अनेक ठिकाणचे भराव खचलेले आहेत.

पावसाळ्यात पाण्याचे लोट येतात, घरे गळतात, मोठा पाऊस पडला की आपोआपच जुन्या आठवणी डोळ्यांसमोर तरळू लागतात. जुन्या गावाजवळ गेल्यानंतर हसत-खेळत बागडणारी मुले, कुटुंबे डोळ्यांसमोर उभी राहतात. पावसाळ्यातील अनेक रात्र आजही जागूनच काढव्या लागतात. तर इतर दिवशी अनेकदा मध्यरात्री दचकून जागे होतो. मात्र, काही झाले तरी धीर धरून जीवन जगायचे आहे. त्याला पर्याय नाही, अशी भावना येथील कुमाजी लेभे, मच्छिंद्र झांजरे यांनी व्यक्त केली.

अशी घडली घटना

30 जुलै 2014 रोजी आंबेगाव तालुक्यात दिवसभर पाऊस पडत होता. दुर्गम भागात त्याचा जोर मोठा होता. दिवस-रात्र पडलेल्या या मोठ्या पावसाने माळीणच्या शेजारील डोंगराच्या भेगांमध्ये, कड्या-कपारीत पावसाचे पाणी साचले. त्यामुळे डोंगराच्या कडा कोसळला. प्रचंड आवाज आणि चिखलाचा मोठा लोंढा झाडांसह गावच्या दिशेने वेगाने आला.

रात्रीच्या वेळी अचानकच घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. काही सेकंदांत संपूर्ण गावच भूस्खलनाच्या मलब्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत 151 लोक मृत्युमुखी पडले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला आठवडाभर शोधकार्य करावे लागले, तर 9 लोक जखमी अवस्थेत सापडले आणि 38 जण कामानिमित्त बाहेरगावी असल्याने वाचले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT