Malin Landslide Pudhari
पुणे

Malin Landslide: एक होतं माळीण!आठ दिवस सुरू होते मृतदेह शोधण्याचे काम

या दुर्घटनेत १५१ ग्रामस्थांचा मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

अशोक शेंगाळे

भीमाशंकर: ३० जुलै २०१४ ची सकाळ... रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानंतर डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये पाणी साचले आणि संपूर्ण डोंगरकडा कोसळला. प्रचंड आवाज, चिखलाचा महाकाय लोंढा आणि त्यासोबत कोसळलेली झाडे काही क्षणांतच माळीण गावावर आदळली. कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही आणि अवघ्या काही सेकंदांत संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

या दुर्घटनेत १५१ ग्रामस्थांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ जण मृत्युमुखी पडले. नऊ जण जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले, तर ३८ जण नोकरी अथवा अन्य कारणांनी गावाबाहेर असल्याने बचावले.

शासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एनडीआरएफ) माध्यमातून सलग आठ दिवस ढिगारा उपसण्याचे काम केले. या मोहिमेत १५१ मृतदेह बाहेर काढण्यात आले. या काळात विविध राजकीय नेते, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, सेवाभावी संस्था, कंपन्या आणि असंख्य स्वयंसेवक मदतीसाठी धावून आले. तहान-भूक विसरून अनेकांनी बचाव आणि मदतकार्यात सहभाग घेतला.

दुर्घटनेनंतर ग्रामस्थांचे नवीन गावठाणात पुनर्वसन करण्यात आले; मात्र, आजही अनेक विकासकामे प्रलंबित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माळीण परिसरात आसाणे पाईर डोहासारखा मोठा बंधारा उंडेवाडीच्या वर गायचोहंड परिसरात उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या जागेचा दोन वेळा सर्व्हे झाल्याचे आणि ती योग्य असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.

याशिवाय जुने माळीण, वरसूबाई मंदिर आणि मोहणवीर वस्तीपर्यंत नवीन वीज पोल उभारण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. शेतीसाठी सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना सुरू करावी, तसेच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माळीण फाटा येथे इयत्ता ११ वी व १२वीचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणीही ग्रामस्थांनी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, १ एप्रिल २०१७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन घरांच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला.

मदतकार्याची ठळक माहिती

  • १५१ जणांचा मृत्यू.

  • ४४ कुटुंबे उद्ध्वस्त.

  • ९ जण जखमी अवस्थेत बचावले.

  • ३८ जण बाहेरगावी असल्याने वाचले.

  • एनडीआरएफकडून सलग आठ दिवस शोधमोहीम.

  • शेकडो स्वयंसेवक, संस्था आणि कंपन्यांनी मदतकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT