पुणे : मान्सून सोमवारी (दि. ९) सोलापुरातून बारामती तालुक्यात आला. मात्र, मंगळवारी पुढे न सरकता तेथेच मुक्कामी राहिला. त्यामुळे पुणे आणि मुंबई शहरातील आगमन लांबले आहे. दरम्यान, मान्सूनच्या दुसऱ्या शाखेने पश्चिम बंगालसह संपूर्ण ईशान्य भारत व्यापला असून, तो बिहारकडे जाण्याच्या तयारीत आहे.
राज्यात ६ जून रोजी मान्सून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापुरात आला. तेथे दोन दिवस मुक्काम करून ८ जून रोजी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात आला. लगेच पुढे बारामती तालुक्यात आला. सोमवारी बारामती येथे ५०.८ मि.मी. पाऊस झाला. मात्र, जिल्ह्यात कुठेही मोठा पाऊस झाला नाही. मान्सून वाऱ्यांना बळकटी कमी असल्याने तो ज्या भागातून जात आहे तेथेच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतो आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात अजूनही असह्य उकाडा जाणवतो आहे.
मान्सून दोन शाखांनी देशात आला आहे. एक शाखा अरबी समुद्रातून केरळमार्गे महाराष्ट्रात तर दुसऱ्या शाखेने बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात आला आहे. महाराष्ट्रात त्याचा प्रवास अडखळत सुरू आहे. मात्र, दुसऱ्या शाखेने तो वेगाने पूर्वोत्तर भारतात पोहोचला आहे. पुढे बिहार, पंजाब, हरियाणा येथे तो १४ जूनपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.
मान्सून राज्यात आला असला तरी वाऱ्यांना बळकटी नसल्याने तो बरसण्यास वेळ लागणार आहे. १० ते १३ जूनदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाज आहे. फक्त विदर्भात मध्यम पावसाचा अंदाज आहे.