पुणे : महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे भाकीत खरे असले तरी मान्सून सरासरी 98 टक्के इतका होण्याची शक्यता आहे. कारण सध्या अल निनो सक्रिय झालेला नाही. तसेच भारतीय समुद्री स्थिरांक तटस्थतेकडून सकारात्मकतेकडे जात आहे. त्यामुळे न घाबरता कमी पाण्याची पिके सुरुवातीच्या काळात घ्यावीत, असा सल्ला पुणे येथील ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.
डॉ. साबळे हे गत 24 वर्षांपासून त्यांनी विकसित केलेल्या साबळे मॉडेलद्वारे मान्सूनचा अंदाज 1 जून रोजी देतात. सोमवारी त्यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीतील दीर्घ पर्जन्यमानाचा अंदाज दिला. यात राज्यातील 84 तालुके आणि 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. वार्याचा वेग, हवेचा दाब ही गृहीतके वापरून हा अंदाज देण्यात आला असून मॉडेलमध्ये अधिक-उणे 5 टक्के त्रुटी गृहीत धरण्यात आली आहे.
डॉ. साबळे यांची निरीक्षणे आणि सल्ला
* धुळे, नाशिक, अहिल्यानगर, नाशिक, पुणे (पूर्व), सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.
* कमी पाण्याची पिके मूग, उडीद, बाजरीचे उत्पादन घ्यावे. ऊस, कापूस ही पिके शक्यतो ठिबक सिंचनावर घ्यावी.
* जायकवाडी, उजनी धरण भरण्याची शक्यता कमी; मात्र राज्यातील उर्वरित सर्व धरणे भरतील.
* राज्यात 43 टक्के पाऊस कमी होणार हा अंदाज कोणी दिला ते माहीत नाही. मात्र तो पूर्ण चुकीचा आहे.
* शेतकर्यांनी न घाबरता 65 मि.मी. पाऊस झाल्यावरच पेरणी करावी.