पुणे: राज्यात मागील काही दिवसांपासून सर्वच भागांत झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण विभागात असलेल्या सर्वच धरणांचा पाणीसाठा सरासरीपेक्षा चांगलाच वाढला आहे.
दरम्यान, सध्या या धरणांमध्ये सुमारे 83 टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षापेक्षा 13 टक्क्यांनी जास्त आहे. मागील वर्षी याच दिवसात 70.23 टक्के पाणी होता. विशेष म्हणजे, कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात यंदा मात्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. एवढा जबरदस्त पाऊस अनेक वर्षांनंतर या भागात झाला. (Latest Pune News)
त्यामुळे धरणे तर भरलीच; शिवाय अनेक नद्यांना महापूर आले. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भागात असलेल्या धरणांमध्ये सध्या 75.69 टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षापेक्षा 45 टक्क्यांनी जास्त आहे.
मागील वर्षी याच दिवसांत या भागातील धरणांमध्ये 30.64 टक्के एवढा कमी पाणीसाठा होता. राज्यात जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे अगोदरच धरणांमध्ये असलेला पाणीसाठा कमी होऊ लागला होता.