Maharashtra Irrigation Reservoir Levels Pudhari
पुणे

Maharashtra Dams Water Level| चिंताजनक! राज्यातील धरणांमध्ये उरला अवघा 25 टक्के पाणीसाठा

मान्सून आला तरी पाऊस लांबला, सर्वाधिक कमी पाणीसाठा पुणे विभागात

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Water Scarcity

पुणे : जून महिना सुरू होऊनही राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राज्यातील सर्व धरणांमध्ये सध्या केवळ 25.79 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 30.36 टक्के होता. त्यामुळे पाणीसाठ्यात सुमारे 5 टक्क्यांची घट झाली आहे. मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात पाऊस लांबल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा तडाखा कायम असून पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती, उद्योग आणि जनावरांच्या पाण्याच्या गरजांबाबतही प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट अधिक गडद होत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील महसुली विभागनिहाय पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यास अमरावती विभागात सर्वाधिक 38.55 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापाठोपाठ नागपूर विभागात 37.52 टक्के आणि कोकण विभागात 31.52 टक्के साठा आहे. तर पुणे विभागात सर्वात कमी 15.79 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, ही बाब विशेष चिंतेची मानली जात आहे.

गेल्या वर्षी याच काळात पुणे विभागातील धरणांमध्ये 26.45 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे या विभागातील पाणीस्थिती अधिक गंभीर बनली आहे.नाशिक विभागात 27.01 टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 28.34 टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा योजना आणि सिंचन व्यवस्थेवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात पावसाने लवकर जोरदार हजेरी लावली नाही, तर अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले असून, धरणांमध्ये नव्याने पाण्याची आवक सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

राज्याच्या विविध महसूली विभागातील धरणांचा सद्याचा पाणीसाठा (पाणीसाठा टक्केवारीत )

प्रदेश ----आजचा ----मागील वर्षीचा

नागपूर- 37.52 --- 32.72

अमरावती --- 38.55 ---38.25

छ.संभाजीनगर --- 28.34 --- 29.88

नाशिक ----- 27.01 --31.87

पुणे ----- 15.79--- 26.45

कोकण --- 31.52--- 33.65

एकूण ----- 25.79--- 30.36

काही महत्वाचे मुद्दे

- राज्यात सर्वात कमी पाणीसाठा पुणे विभागात

- राज्यात सर्वात अधिक पाणीसाठा अमरावती विभागात

- मागील वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांमध्ये सरासरीपेक्षा सुमारे 5 टक्क्यांनी पाणीसाठा घटला

राज्यात शून्य पाणीसाठा असलेली धरणांची संख्या सुमारे 18 आहे. त्यामध्ये खडकपूर्णा (बुलढाणा), बोरगाव अंजनपूर ( बीड), रोशनपुरी (बीड), सिधेश्वर ( हिंगोली), किनवट (नांदेड), औराद (धाराशिव ), गुंजारगा (धारशिव ), लिंबाळा (धाराशिव), मदनसुरी (धाराशिव ), सिना कोळेगाव ( धाराशिव ), तागरखेडा ( धाराशिव ),बिंडगीहाळ (लातूर), भावली (नाशिक ), तिल्लारी (धामणे- कोल्हापूर), पिंपळगाव जोगे ( पुणे ), घोड (चिंचणी -पुणे ), गुंजवणी (पुणे ), लोणावळा टाटा (पुणे ), भीमा उजनी (सोलापूर),

मान्सूनचे आगमन झाले असले तरी समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाही.पाणीटंचाई व दुष्काळाच्या शक्यतेमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT