पुणे: राज्यातील सर्व विभागांत असलेल्या 3 हजारांहून अधिक धरणांमध्ये सध्या केवळ 33.95 टक्के पाणीसाठा शिल्ल्क राहिला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होऊन धरणात व्यवस्थित साठा होईपर्यंत पाणी जपून वापरण्याचे अवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
त्यातच या वर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनच्या काळात पाऊस कमी पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे अगदी ऐन पावसाळ्या तही पाण्याची काटकसर करण्याची वेळ राज्यातील नागरिकांवर येण्याची शक्यता आहे.
राज्यात जलसंपदा विभागाच्या अंतर्गत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण हे विभाग येतात. त्या सर्व विभागांत मिळून एकूण 3 हजार 28 मोठे, मध्यम व लघु प्रकल्प समाविष्ट आहेत.
त्यातही सर्वात अधिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर विभागात असून, त्यांची संख्या 929 आहे, तर सर्वात कमी 173 प्रकल्प कोकण विभागात आहेत. असे असले तरी यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासूनच धरणांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले.
तसेच सिंचन आणि नागरिकांना पिण्यासाठी देखील पाण्याचा वापर चांगलाच वाढल्याने पाण्याचा उपसाही वाढला. परिणामी धरणातील पाण्याची पातळी सरासरीपेक्षा खूपच खालावली. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याच्या सूचना जलसंपदा विभागामार्फत राज्यातील शेतकरी व नागरिक यांना करण्यात आल्या आहेत.