पुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या प्रेरणेतून छत्रपती महाराणी ताराराणी यांनी छत्रपती श्री संभाजी महाराज, छत्रपती श्री राजाराम महाराज यांच्यानंतर हिंदवी स्वराज्य टिकविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्याकडे उत्तम युद्ध आणि प्रशासकीय कौशल्य होते. छत्रपती महाराणी ताराराणी यांचे माहात्म्य, कार्यकर्तृत्व, स्वराज्य टिकविण्यासाठी केलेला संघर्ष समाजपर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत संभाजीराजे यांनी गुरुवारी (दि.2) व्यक्त केले.
सरहद पुणे, महाराष्ट्र सदन (नवी दिल्ली) आणि राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्ली येथे महाराणी ताराराणी यांच्या 351व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या मराठी साहित्य संमेनलाच्या निमित्ताने महाराणी ताराराणी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
महापौर मंजूषा नागपुरे, सरहदचे संस्थापक संजय नहार, विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज नहार, लेखक मयूर मसूरकर, गोपाळ कांबळे उपस्थित होते.छत्रपती महाराणी ताराराणी सन्मानाने अबोली राऊत, डॉ. लीना बोकील, ममता सपकाळ, मेजर डॉ. मोनिका बारणे, अंजू माने, साधना चव्हाण, सुवर्णा गोखले, आशा खेडकर, अलका गुंजाळ, स्वाती डिंबळे यांना गौरविण्यात आले. नागपुरे यांनी मराठा सामाज्य टिकविण्यासाठी केलेले छत्रपती महाराणी ताराराणी यांचे कार्यकर्तृत्व महनीय आहे. त्या शौर्य, धैर्य असणाऱ्या रणरागिणी होत्या, असे सांगितले.
तैलचित्र लावण्यासाठी प्रयत्न
छत्रपती महाराणी ताराराणी यांचे तैलचित्र मुंबईतील मंत्रालयात आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनात नसल्याचे संजय नहार यांनी प्रास्ताविकात सांगितले. हा धागा पकडून संभाजीराजे म्हणाले की, मंत्रालयात आणि महाराष्ट्र सदनात छत्रपती महाराणी ताराराणी यांचे तैलचित्र लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करतो. तैलचित्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका असेल, असे त्यांनी जाहीर केले.