पेठ; पुढारी वृत्तसेवा : कुदळेवाडी (ता. आंबेगाव) भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत परिसरात पाच ते सात कुत्री ठार मारली आहेत. गेल्या तीन दिवसांत अनेक शेतकर्यांना बांधावर बिबट्या दिसला आहे. कुदळेवाडी येथील कोलरी डोंगराच्या कुशीत असलेल्या कपारीत व डोंगराच्या परिसरात वाघाचे अस्तित्व आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून बिबट्याचे दर्शन अनेकांना झाले आहे.
विजेचा प्रश्न बिकट आहे. दिवसा वीज नसल्याने शेतकर्यांना रात्री पाणी देण्यासाठी जावे लागते. शेतात पाणी भरत असताना बिबट्या टॉर्चच्या दिशेने मोठमोठ्याने डरकाळ्या फोडतो. त्यामुळे बिबट्याची परिसरात दहशत निर्माण झाली आहे. अनेकदा वन खात्याकडे नागरिकांनी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी वन खात्याकडे केली. परंतु, पिंजरा लावण्यात आला नाही. सहा महिन्यांपूर्वी कुदळेवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्या वेळी शेतकरी प्रकाश कुदळे, बाबाजी कुदळे, प्रल्हाद कुदळे यांनी वन खात्याकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. परंतु, वन खात्याने दखल घेतली नाही.
आता पुन्हा एकदा बिबट्याने कुदळेवाडी परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसादेखील घराबाहेर पडण्याची भीती वाटू लागली आहे. कुदळेवाडी-भावडी परिसरात वन खात्याने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी माजी सरपंच शिवाजी मोरे, सोसायटीचे अध्यक्ष सोपानराव नवले यांनी केली आहे. प्रकाश कुदळे यांनी वन खात्याला याबाबत निवेदन दिले आहे.