पुणे: कृष्णा खो-याच्या अंतर्गत असलेल्या सर्व धरणांमध्ये कडक उन्हामुळे पाण्याची पातळी खालावू लागली आहे. पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने सध्या केवळ 34.07 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवसात पाणीसाठा 40टक्के होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 6.93 टक्क्यांनी कमी झाला आहे. ही बाब लक्षात घेता पाण्याचे नियोजन करण्याची वाढली गरज आहे. त्यातच यंदा अलनिनोमुळे पाऊसमान कमी होण्याची शक्यता वाढली असून, पिकांसाठी देण्यात येणारे उन्हाळी आवर्तन कमी करण्यावर भर द्यावा लागणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील पिण्याचे पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्याबरोबर कृष्ण खोरे विकास महामंडळांच्या सर्व धरणांच्या पाणीलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठा तुंडुंब होता. पिकांसाठी आवर्तन, स्थानिक स्वराज्य सस्थां,एम.आय.डी.सी., पाणी पुरवठा संस्था ठरवून दिलेल्या पाणी कोट्यापेक्षा जादा पाणी उचलत असल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वेळेच्य आधीच कमी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
एप्रिल महिन्यातच कृष्णा खो-यामधील पाणीसाठयाची अवस्था अवघ्या 34 टक्क्यांवर आली आहे. अजुन कडक उन्हाचे दोन महिने असून, पाण्याचा वापर असाच वाढत राहिला तर धरणांच्या पाणीसाठा तळ गाठण्याची शक्यता आहे. त्यातच यावर्षी हवामान विभागाने ‘ अलनिनो’मुळे यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने सर्व स्थानिक संस्थाना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात तीव्र उन्हाळा असल्यामुळे कृष्णा खो-यातील धरणांमधील पाण्याचे अंदाजे बाष्पीभवन 9 टक्के होत असल्याचे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.म्हणजेच पाण्याच्या एकूण पाणीसाठ्यात ही टक्केवारी गृहित धरण्यात येत असते.
कृष्णा खो-याच्या अंतर्गत लहान,मध्यम आणि मोठे असे मिळून सुमारे 724 प्रकल्प आहेत. त्यामध्ये 38 प्रकल्प मोठ्या पाणीसाठ्याचे आहेत.
कृष्णा खो-याच्या अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर (काही भाग), धाराधिव ( या जिल्ह्याचा देखील काही भाग समाविष्ट आहे.- कृष्णा खोर्यातील प्रकल्पांद्वारे सुमारे 9.85 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे