वेल्हे: पुणे जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या खडकवासला ते फुरसुंगी भूमिगत कालवा प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. खडकवासला येथून या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहराची वाढती पाण्याची गरज आणि वारंवार फुटणाऱ्या कालव्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने हाती घेतलेल्या खडकवासला ते फुरसुंगी बंद कालव्याच्या कामाला आता गती मिळाली आहे.
28 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पहिल्या 3 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प पुढील 3 वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. उर्वरित 25 किमीचे काम तांत्रिक आव्हाने पार करून पुढील 3 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पामुळे बाष्पीभवन आणि गळती थांबून सुमारे पाण्याची बचत होणार आहे. उघड्या कालव्यामुळे पाण्यात कचरा टाकणे, प्रदूषण आणि अनधिकृत पाणीउपसा यांसारख्या समस्या निर्माण होत होत्या. बंद नलिकेमुळे आता शुद्ध पाणी थेट फुरसुंगीपर्यंत पोहोचणार आहे. तसेच, कालवा फुटण्याच्या संकटातून परिसरातील नागरिकांची कायमस्वरूपी सुटका होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याचा कालवा ज्या जागेवरून जातो, ती जागा मोकळी होणार आहे. या जागेचा वापर रस्तेनिर्मितीसाठी केल्यास पुणे शहरातील, विशेषतः सिंहगड रस्ता आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहे.