खडकवासला: खडकवासला धरण साखळीतील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाट माथ्यासह पानशेत मुठा खोऱ्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जाेर गुरुवारी (दि.९) ओसरला. सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत १६.१७ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे ५५.४९ टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या २४ तासांत धरणांत सव्वा टीएमसीची भर पडली आहे.
खडकवासला भागात गुरुवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली. मात्र, घाट माथ्यासह पानशेत, वरसगाव, टेमघर खोऱ्यात पावसाळी वातावरण कायम असून, रिमझिम सुरू आहे. नद्या-ओढे नाल्यांतून पाण्याचे प्रवाह सुरूच आहेत. त्यामुळे धरण साखळीच्या पाणीसाठ्यात भर पडत आहे.
धरण साखळीत बुधवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजता १४.९५ टीएमसी इतका पाणीसाठा होता. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातील विसर्ग बुधवारी रात्री साडेदहा वाजता बंद करण्यात आला आहे. मुठा कालव्यात, तसेच पुण्यासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्याची तूट भरून खडकवासला धरणाची पातळी स्थिर आहे.
पानशेत, वरसगाव धरण माथ्यासह खडकवासला भागात पावसाने उघडीप दिली. मात्र, पानशेत मुठा खोऱ्यात रिमझिम सुरू आहे. बुधवारी (दि.८) सकाळी सहा ते गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत १२७, तर पानशेत येथे ६२, वरसगाव येथे ५४ व खडकवासला येथे १४ मिलिमीटर पाऊस पडला.
एका महिन्याचे पाणी उजनी धरणात
पुणे शहर परिसराला पिण्यासाठी एक महिना पुरेल इतके १.५१ टीएमसी जादा पाणी खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात आले. या पाण्याचा लाभ उजनी धरणाला झाला आहे. धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे मंगळवारी (दि. ७) रात्री बारा ते बुधवारी (दि. ८) रात्री साडेदहा वाजेपर्यंत अवघ्या साडेबावीस तासांत हे पाणी सोडण्यात आले.