खडकवासला: घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात शनिवारपासून (दि. १५) पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, ओढे-नाल्यांतून पाण्याची आवक सुरूच असल्याने खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांतून विसर्ग सुरू आहे. खडकवासलातून सध्या मुठा नदीपात्रात १ हजार ७१२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणसाखळीत सध्या शंभर टक्के पाणीसाठा आहे.
गेल्या चाळीस दिवसांत खडकवासला धरणातून तब्बल २२ टीएमसी पाणी सोडण्यात आले. यातील १५.८७ टीएमसी पाणी मुठा नदीत, तर जवळपास ६ टीएमसी पाणी मुठा कालवा व बंदिस्त जलवाहिन्यांतून पिण्यासाठी सोडण्यात आले.
वरसगावमधून सध्या ६००, पानशेत १ हजार ५८० आणि टेमघरमधून ५७२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. या तिन्ही धरणांच्या विसर्गाची भर खडकवासलात पडत आहे. पिण्यासाठी मुठा कालवा व बंदिस्त जलवाहिन्यांत पुरेशा प्रमाणात पाणी सोडले जात आहे. या पाण्याची तूट भरून खडकवासला शंभर टक्के भरून वाहत आहे. त्यामुळे मुठा नदीत अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे.
जून महिना कोरडा जाऊनही चार-पाच दिवसांचा अपवाद वगळता १ जुलैपासून धरणक्षेत्रात सलगपणे पाऊस सुरू आहे. अद्यापही धरणक्षेत्रात पावसाळी वातावरण कायम आहे. पावसाचा जोर कमी झाला असला, तरी घाटमाथ्यासह डोंगरी पट्ट्यात श्रावण सरींबरोबर रिमझिम सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. १८) दिवसभरात पानशेत येथे ११, वरसगाव येथे १३, टेमघर येथे ४ व खडकवासला येथे १ मिलिमीटर पाऊस पडला.