खडकवासला: घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चारही धरणांत पाण्याची आवक वाढल्याने धरणसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. खडकवासला धरणसाखळीत गुरुवारी सायंकाळी पाच वाजता २१.७० टीएमसी म्हणजेच ७४.४४ टक्के पाणीसाठा झाला होता.
दरम्यान, खडकवासला धरण ९५ टक्के भरल्याने रात्री आठनंतर मुठा नदीपात्रात३८२५ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या वर्षी २३ जुलै २०२५ रोजी धरणसाखळीत २३.३० टीएमसी (७९.९४ टक्के) इतका पाणीसाठा होता. पानशेत वरसगाव-टेमघर खोऱ्यात सलग चौथ्या दिवशीही संततधार पाऊस सुरू आहे. पानशेत धरण ७६.४४ टक्के भरले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या तीन दिवसांत हे धरण पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
टेमघर येथे बुधवारी (दि. २२) सकाळी सहा ते गुरुवारी सकाळी सहापर्यंत १९७ मिलीमीटर पाऊस पडला. तसेच याच कालावधीत पानशेत येथे ८४, वरसगाव येथे ६९ आणि खडकवासला येथे १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी दिवसभरात पानशेत येथे २३, वरसगाव येथे २३, टेमघर येथे ५१ आणि खडकवासला येथे १ मिलीमीटर पाऊस पडला.
धरणक्षेत्रात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. नद्या, ओढे-नाले दुथडी भरून वाहत असल्याने धरणसाठ्यात झपाट्याने वाढ सुरू असून, गेल्या २४ तासांत धरणसाखळीत १.५६ टीएमसी पाण्याची वाढ झाली. बुधवारी (दि.२२) सायंकाळी पाचपपर्यंत धरण साखळीत २०.१६ टीएमसी पाणी होते.
धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरण गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत ९५ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी खबरदारी घ्यावी. पावसाचा जोर कायम राहिल्या विसर्गात आणखी वाढ करण्यात येणार आहे.- किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला धरण जलसंपदा विभाग