आळेफाटा : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवारी उन्हाळी कांद्याची हंगामातील सर्वाधिक म्हणजेच उच्चांकी आवक नोंदवली गेली. तब्बल 25 हजार 252 गोणी कांदा विक्रीस आला असून, लिलावात कांद्याला प्रति 10 किलो रुपये 164 इतका कमाल भाव मिळाला. तरीही एकूण बाजारभाव स्थिर राहिल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण दिसून आले. ही माहिती सभापती संजय काळे व उपसभापती प्रीतम काळे यांनी दिली. (Latest Pune News)
आळेफाटा उपबाजारात आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी कांदा लिलाव होतो. जुन्नर, शिरूर, तसेच शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर आणि अकोला तालुक्यातील शेतकरी येथे कांदा विक्रीस आणतात. त्यामुळे वर्षभर येथे कांद्याची चांगली आवक कायम असते.
गेल्या काही महिन्यांपासून उन्हाळी कांद्याचे दर घटल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साठवणुकीकडे वळले होते. मात्र, भावात सुधारणा न झाल्याने आणि पावसामुळे कांद्यावर परिणाम होऊ लागल्याने ऑगस्टनंतर शेतकरी कांदा विक्रीस आणू लागले. परिणामी, मागील काही आठवड्यांपासून बाजारातील आवक सातत्याने वाढत आहे.
सध्या पावसाळी हंगामातील लाल सेंद्रिय कांदा विक्रीस येत असताना, शेतकरीवर्ग साठवलेला उन्हाळी कांदाही बाजारात आणत आहे. त्यामुळे आवक विक्रमी वाढली असली तरी भाव मात्र घसरणीच्या पातळीवरच आहेत. शेतकऱ्यांच्या मते, सध्याच्या दरात उत्पादन खर्चही वसूल होत नाही.
उपबाजारातील लिलावात कांद्यास मिळालेले दर पुढीलप्रमाणे : एक्स्ट्रा गोळा : रु. 150 ते रु. 164 प्रति 10 किलो, सुपर गोळा : रु. 130 ते रु. 150 प्रति 10 किलो, सुपर मीडियम : रु. 120 ते रु. 130 प्रति 10 किलो, गोल्टी / गोल्टा : रु. 90 ते रु. 110 प्रति 10 किलो, बदला / चिंगळी : रु. 10 ते रु. 60 प्रति 10 किलो.
आळेफाटा उपबाजारातील आवक आणि दर याची माहिती संचालक नबाजी घाडगे, सचिवरूपेश कवडे आणि कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोणी (ता. आंबेगाव) येथील उपबाजार आवारात बुधवार (दि. 25) सुमारे नऊ हजार काद्यांच्या पिशव्यांची आवक झाली. आवक वाढल्याने काद्यांचे भाव गडगडल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. लोणी बाजारात नंबर एक काद्यांला प्रतिदहा किलोला 130 ते 140 रुपये, नंबर दोनला 90 ते 125, गोल्टी कांदा 40 ते 80 रुपये, बदला कांदा 10 ते 30 रुपये असा बाजारभाव मिळाला. याबाबत सभापती नीलेश थोरात व उपसभापती सचिन पानसरे यांनी माहिती दिली.
तर येथील उपबाजार समितीत शिरूर, खेड तालुक्यातून व आंबेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस येतो, असे सचिव सचिन बोऱ्हाडे यांनी सांगितले. दिवाळी अगदी दोन ते तीन दिवसांवर आली असताना काद्यांचे बाजार भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव नारजी व्यक्त केली आहे. येथील कांदा लिलावात आडतदार महेंद्र वाळूंज, नितीन नरवडे, मच्छिंद्र वाळूंज, संजय भोजने यांनी भाग घेऊन काद्यांचे लिलाव केल्याचे उपबाजार समितीचे कर्मचारी ए. ए. आतार व दत्ता धुमाळ यांनी सांगितले.