पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा: शिस्तारवस्ती येथे शेतातील पिकाला पाणी देऊन दुचाकीवरून घराकडे चाललेल्या मंगेश सुरेश चव्हाण (वय 33) या तरुणावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि. 6) रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने शेतीपंपांना रात्रीचा वीजपुरवठा जीवघेणा ठरत असल्याने दिवसा वीजपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान मंगेश चव्हाण हा तरुण कांद्याच्या रोपांना पाणी देऊन आपल्या दुचाकीवरून घराकडे परतत होता. या वेळी शिस्तारवस्ती येथील ओढ्यानजीक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला.
आरडाओरड करून भयभीत झालेले चव्हाण यांनी तेथून पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने ते थोडक्यात बचावले. मात्र, या हल्ल्यात त्यांच्या पायाला व हाताला जखमा झाल्याने त्यांना उपचारासाठी जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, दिनेश गाजरे, आनंद जगताप यांनी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती कळताच शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे वनपाल गणेश पवार, सविता चव्हाण, ऋषिकेश लाड व महेंद्र दाते यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून, रुग्णालयात धाव घेतली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने या ठिकाणी तत्काळ पिंजरा लावला आहे.
दिवसा विजेची मागणी वार्यावरच
बेट भागातील काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबूत, वडनेर खुर्द, चांडोह या परिसरात मागील दोन ते तीन महिन्यांत बिबट हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असले, तरी या परिसरात बिबट्यांची संख्या मोठी असून, अन्न-पाण्याच्या शोधात त्यांचा मुक्त संचार वाढलेला आहे. परिणामी, शेतकर्यांना शेतात काम करण्यासाठी मोठी भीती निर्माण झाली असून, रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे शेतीपंपांना दिवसा वीज मिळावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून शेतकरी करीत आहेत. या भागातील लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत असून, शेतकर्यांच्या या समस्येवर शासनदरबारी आवाज उठवून शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.