मागील महिन्यात नदीला पूर आल्यानंतर नदीपात्रातील राडारोडा काढण्याची मोहीम महापालिकेने मोठा गाजावाजा करून हाती घेतली. त्यानंतर आता पुन्हा नदीपात्रात राडारोडा टाकून भराव केला जात असल्याचे समोर आले आहे. हे काम दिवसाढवळ्या सुरू असताना महापालिका व पाटबंधारे विभाग मात्र, याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे.
शहर आणि धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने मागील महिन्यात सिंहगड रस्त्यासह शहरातील विविध भागात पूर आला होता. अनेक सोसायट्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. नाले, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. या वेळी तब्बल 5 हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. तर, विविध दुर्घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता.
या पुराची कारणे शोधण्यासाठी महापालिका व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांची संयुक्त अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती. तसेच पुराचे कारण नदीपात्रात टाकण्यात आलेला राडारोडा व भराव असल्याचेही सांगण्यात आले. यानंतर महापालिकेने मोठा गाजावाजा करत नदीपात्रात राडारोडा टाकून तयार करण्यात आलेले प्लॉट उद्ध्वस्त करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचीही गर्जना केली होती. त्यानंतर महापालिकेने सुमारे 300 ट्रक राडारोड काढून घेतला.
भराव काढल्यानंतर महापालिकेने पुन्हा भराव टाकला जाऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र, महापालिकेला या सर्व गाष्टींचा विसर पडला. त्यामुळे पुन्हा एकदा नदीपात्रात बेकायदा भराव टाकून प्लॉट करण्याचे उद्योग सुरू झाले, याकडे महापालिका व पाटबंधारे प्रशासनही सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे.