भोर; पुढारी वृत्तसेवा: वीर, भाटघर धरणग्रस्त भागात सुमारे 30 कोटींचा निधी मंजूर असून, याअंतर्गत असणारे रस्ते काँक्रिटीकरण, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह या कामांच्या निविदा प्रक्रियेत असून लवकरच या भागातील कामांना सुरुवात होऊन प्रश्न मार्गी लागतील, अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव अंतर्गत असलेल्या कुरुंजी (ता. भोर) येथील आश्रमशाळेच्या सुमारे 5 कोटी निधींच्या इमारतीचे उद्घाटन, विद्यार्थ्यांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा, जिल्हा परिषद माजी सदस्य विठ्ठल आवाळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आ. थोपटे बोलत होते.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, खरेदी-विक्री संघाचे संचालक काळूराम मळेकर, काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ज्ञानेश्वर नलावडे, कुरुंजाई विकास सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष नथू नलावडे, आयटी सेलचे अध्यक्ष अनिल सावंत, सरपंच विठ्ठल वरखडे, उपसरपंच निवृत्ती शिळीमकर, पोलिस पाटील अनिल डोंबे वसंत वरखडे, भाऊ मळेकर आदींसह ग्रामस्थ, महिला, शिक्षक वृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.