पुणे

पुणे : गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्परसंवाद हवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आल्याने नव्या आव्हानांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्परसंवाद महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. हायर एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजित 'भारतात उच्च शिक्षणातील धोरण निश्चिती आणि परिवर्तन' या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमप्रसंगी एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, वरमॉन्ट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमाला, एमआयटी, कानपूरचे माजी संचालक संजय धांडे, बफेलो विद्यापीठाचे अध्यक्ष सतीश त्रिपाठी, डॉ. राहुल कराड, डॉ. आर. एम. चिटणीस आदी उपस्थित होते. कोश्यारी म्हणाले, मजगातील मानवजातीला एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार भारतात परदेशी विद्यापीठांना संधी आहे, त्याचा उपयोग देशातील विद्यापीठांना होईल.

आपल्या देशाकडेही जगाला देण्यासाठी भारतीय मूल्य विचारांसह विविध प्रकारचे ज्ञान आहे. त्यामुळे शैक्षणिक देवाण-घेवाण सर्वांना उपयुक्त ठरेल. चांगले नागरिक घडविण्यासाठी मूल्यशिक्षणही महत्त्वाचे आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून उच्च शिक्षणाबाबत विचार करताना उद्दिष्ट निश्चित करून त्याकडे जाण्याचा मार्ग शोधावा लागेल. त्यादृष्टीने कार्यशाळा उपयुक्त ठरू शकेल. खासगी विद्यापीठांनी समर्पित भावनेने शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, की भारत आणि अमेरिकेचा विचार करण्यासोबत जागतिक शिक्षण क्षेत्रात अनुकूल बदलाचा विचार करण्यासाठी एक मंच तयार करावा. वसुधैव कुटुंबकम हा भारताने जगाला दिलेला विचार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT