शिवाजी शिंदे
पुणे : राज्यातील विविध ऊस कारखान्यांवर दिवसरात्र मेहनत करून साखर उत्पादन करण्यास मदत करणार्या ऊसतोडणी कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आता कायमस्वरूपी दहा लाखांचे विमासंरक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या ऊसतोड कामगारांना अपघाती, नैसर्गिक अथवा इतर कोणत्याही प्रकारे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास ही रक्कम त्यांना मिळणार आहे. ऊसतोडणीदरम्यान कामगारांना केवळ प्रवासासाठी असलेले हे विमाकवच आता कायमस्वरूपी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाने घेतला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांत बरेच साखर कारखाने आहेत. ऊसतोड कामगार या कारखान्यांसाठीचा महत्त्वाचा घटक आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ या भागांतील दहा जिल्ह्यांमधून ऊसतोड कामगार साखर कारखान्यांवर कुटुंबासह ऊसतोडणीसाठी येत असतात. पूर्वी या कामगारांसाठी कारखान्याच्या वतीने केवळ येता-जाता (प्रवासासाठी) विमासंरक्षण देण्यात येत होते, तेही केवळ तीन लाख रुपये एवढे होते.
विशेष म्हणजे, जे कामगार सहा महिने ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर राबत असले, तरी त्यांना इतर कोणत्याही सोयीसुविधा कारखान्यांच्या व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येत नव्हत्या, त्यामुळे या कामगारांचे जीवन म्हणजे अत्यंत हलाखीचे होते. आता मात्र राज्य शासनाने यामध्ये अनेक बदल केले असून, या कामगारांच्या सुविधासांठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
या महामंडळाच्या वतीने ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दहा लाख रुपयांचे विमासंरक्षण तेही कामयस्वरूपी करण्यात आले आहे. हा निर्णय नोंदणीकृत ऊसतोड कामगारांसाठीच लागू असणार आहे. त्यासाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी तसेच महामंडळाकडील ओळखपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कायमच उघड्यावरचे जिणे जगणार्या आणि ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता साखर कारखान्यांवर राबणार्या राज्यातील दहा जिल्ह्यांतील दहा ऊसतोड कामगारांसाठी दहा लाखांचे विमासंरक्षण कायमस्वरूपी करण्यात आले आहे. ही विमासंरक्षण योजना लागू करण्यात आली आहे.
– डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण