मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदगुडेवाडी, भोंडवेवाडी येथील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाकडून मंगळवारी (दि. 12) करण्यात आली. या भागातील विहिरींतील पाण्याच्या स्रोतांची, पिकांची परिस्थिती, तलावांची माहिती केंद्रीय पथकातील खाद्य मंत्रालयाच्या प्रमुख सरोजिनी रावत यांनी घेतली. या वेळी अनेक शेतकर्यांनी वीज बिलाबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. विजेचे धोरण शेतकर्यांसाठी अनियमित असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. शेतकर्यांना रात्रंदिवस शेतामध्ये पाण्यासाठी थांबावे लागते, यामुळे शेतकरी त्रासलेला आहे. विहिरीत पाणी नसले तरी व शेतीला पाणीपुरवठा होत नसला तरी विजेचे बिल भरावेच लागते, असेही अनेक शेतकर्यांसह विठ्ठल किसन रासकर यांनी सांगितले. शेतकर्यांनी सांगितलेल्या बाबींच्या रावत यांनी नोंदी करून घेतल्या. या वेळी चांदगुडेवाडीचे सरपंच अशोक खैरे उपस्थित होते.
बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर या वेळी पथकाबरोबर होते. कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी रावत यांना कृषीविषयक माहिती दिली. या वेळी जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे, मंडल अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषी अधिकारी सुपा प्रशांत मोरे, कृषी अधिकारी सुभाष बोराटे हे कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. सुपा, चांदगुडेवाडी इत्यादी तलाठी धनंजय गाडेकर, नितीन यादव, बाबासाहेब भागवत जळगाव सुपे, चांदगुडेवाडीचे सरपंच अशोक खैरे उपस्थित होते. सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी, तसेच विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :