बारामती: मुसळधार पावसामुळे बारामती शहर व तालुक्यात झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळपासून पाहणी करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना धीर दिला. शहर व परिसरातील पाहणीनंतर पवार हे ग्रामीण भागात पाहण्यासाठी जाणार आहेत.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर पुणे जिल्ह्यातील बारामती भागात मान्सून पूर्व अतिवृष्टी झाली आहे. तसेच बारामती इंदापूर तालुक्यातून वाहणारा निरा डावा कालवा फुटला आहे. त्यामुळे कॅनल मधून वाहणारे पाणी लोक वस्तीसह शेतीमध्ये शिरले आहे. (Latest Pune News)
या अतिवृष्टी मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी, शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. अध्यापही शेतकऱ्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पाहणी करत आहे.
सकाळी सहा वाजल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. बारामतीमधील एमआयडीसी पेन्सिल चौका शेजारील तीन बिल्डिंग पावसाने खचल्या आहेत.
साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ अशी बिल्डिंगची नावे आहेत. तिन्ही बिल्डिंगमधील रहिवाशांनी पोलीस स्टेशनला काल धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची पाहणी आज केली व नागरिकांशी संवाद साधत काळजी करू नका आम्ही सर्व आपल्या सोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला.
वर्षभराचा पाऊस एकाच दिवसात झाला..!
बारामतीत सरासरी 14 इंच पावसाची सरासरी आहे. मात्र मागील तीन दिवसात बारामतीत अतिवृष्टी झाल्याने सात इंच इतका पाऊस झाला आहे. काल दिवसभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलेल आहे. निरा डावा कॅनॉल देखील फुटलेला आहे. सकाळपासून परिस्थितीची पाहणी करत आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.