पारगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कडाक्याच्या उष्णतेचा पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. उन्हामुळे दररोजच पिकांना पाणी द्यावे लागत आहे. उष्णतेमुळे आंब्याच्या झाडांना आलेल्या कैर्या मोठ्या प्रमाणात गळून पडत आहेत.
अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे दूर होऊन मागील आठवड्यापासून पुन्हा कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. दिवसभर भयंकर उष्णता असते. यामुळे नागरिक अक्षरश: बेजार झाले आहेत. रात्रीदेखील वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होत आहे. वाढत्या उष्णतेचा सर्वच पिकांवर विपरीत परिणाम होत आहे.
उन्हाळी हंगामातील भुईमूग पिकाला उन्हाचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिसरातील अनेक शेतांमधील भुईमुगाचे पीक उन्हामुळे अक्षरश: होरपळून चालले आहे. यंदा वाढत्या उन्हाचा आंब्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. आंब्यांच्या झाडाला आलेल्या कैर्या उन्हामुळे जमिनीवर गळून पडत आहेत. चारापिकेही जळू लागली आहेत.