पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून देणार्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता त्यांना दरमहा 2 हजार 500 रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे अल्प मानधनावर काम करणार्या कर्मचार्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्यात 1995 पासून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. 2008 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येऊ लागला.
अलीकडेच या योजनेला 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना' असे नाव देण्यात आले. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिजविलेल्या अन्नाच्या स्वरूपात पोषण आहार दिला जातो. त्यासाठी स्वयंपाकी तथा मदतनिसांची नेमणूक करण्यात येते. सद्य:स्थितीत त्यांना दरमहा दीड हजार रुपये मानधन दहा महिने दिले जाते. त्यात केंद्र सरकारचा हिस्सा सहाशे रुपये आणि राज्याचा हिस्सा नऊशे रुपये आहे. मानधनाची रक्कम अत्यल्प असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर 2023-24 पासून या मानधनात वाढ करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे.
एप्रिलपासून मिळणार वाढ
शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार राज्य आणि केंद्राचा हिस्सा मिळून एकूण अडीच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे एक हजार रुपयांनी मानधनाची रक्कम वाढविण्यात आली आहे. एप्रिल 2023 पासून मानधनवाढ लागू होईल. मानधनातील केंद्राच्या हिश्याची रक्कम वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालकांना देण्यात आले आहेत