पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये पावसाची सुरू असलेली रिपरिप आणि त्याच बरोबरीने वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सध्या थंडी, ताप, खोकला, घसा दुखणे, अंगात कणकण येेणे आदी आजारांचे रुग्ण महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी येत आहेत. महापालिका रुग्णालयांमध्ये या रुग्णांची गर्दी वाढली आहे. तर, खासगी रुग्णालयांमध्येदेखील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
कानात बुरशी येणार्या रुग्णांचेही प्रमाण वाढले आहे. कानातला मळ काढताना काही वेळेला हा मळ आत ढकलला जातो. असा मळ काढता येत नाही. अशा परिस्थितीत शल्यविशारदांना हा मळ त्यांच्याकडील वैद्यकीय साहित्याने काढावा लागतो, अशी माहिती कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी दिली.
?गेल्या महिनाभराच्या तुलनेत जवळपास 50 टक्क्याने ही वाढ असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदविले आहे. गेल्या सात ते आठ दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप, कणकण, अंगदुखी आणि घसादुखी यांचे रुग्ण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
सध्या व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी पावसात भिजणे टाळावे. गरम पाण्याची वाफ घ्यावी. पचायला जड, चमचमीत आहार टाळावा. साधा आणि सकस आहार घ्यावा. हळद-दूध, गरम पाण्यात हळद आणि मीठ टाकून गुळण्या कराव्या. ताप वाढत गेल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे.
– डॉ. अविनाश वाचासुंदर, कान-नाक-घसा तज्ज्ञ.