चाकण; पुढारी वृत्तसेवा : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी (दि. 28) कांद्याची 10 हजार 750 क्विंटल म्हणजेच 21 हजार 500 पिशवी आवक झाली. शेतकर्यांना अपेक्षित बाजारभाव मात्र मिळाला नाही. प्रतिक्विंटलला 1 हजार ते 1 हजार 600 रुपये भाव मिळाला. सरासरी 1200 ते 1400 रुपये एवढी राहिली. जुना कांदा संपला असतानाही नवीन कांद्याच्या भावातही स्थानिक बाजारपेठेतील भावात मोठी सुधारणा होत नसल्याची स्थिती समोर येत आहे.
याबाबत चाकण मार्केटमधील काही निर्यातदार कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, दक्षिण-पूर्व आशियातील बाजारपेठांना सुटी असल्याने निर्यातीवर मर्यादा आल्याने भावात अपेक्षित वाढ झाली नाही. लासलगावमध्ये नवीन वर्षात 1 हजार 451 रुपये भाव मिळाला होता. त्यानंतर हा भाव 1300 ते 1500 रुपयांवर स्थिरावला आहे. देशातंर्गत कांदा बिहार, ओडिशा, आगरतळा, मिझोराम, त्रिपुराकडे विक्रीसाठी रेल्वेने रवाना होत आहे.
मलेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स व व्हिएतनामच्या बाजारपेठांना सुटी मिळण्यापूर्वी तेथील आयातदारांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करून ठेवली आहे. दरम्यान चाकण मार्केटमध्ये पुढील काळात खूप मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होणार असून, केंद्र शासनाने निर्यातीस प्रोत्साहन देणारे धोरण ठरवण्याची शेतकरी आणि निर्यातदार कंपन्यांची मागणी आहे. चाकण मार्केटमध्ये बटाट्याची 1 हजार 750 क्विंटल आवक होऊन 1 हजार ते 1 हजार 400 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनकडून देण्यात आली. बटाट्याचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिर असल्याचे अडत्यांनी सांगितले.