पुणे

कामशेत : वातावरणातील बदलामुळे दवाखाने ‘फुल्ल’

अमृता चौगुले

कामशेत : परिसरात दिवसा उन्ह आणि रात्री थंडी अशा बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे सर्दी, खोकला, थंडी, ताप आदी साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून, परिसरातील दवाखानेही फुल्ल झाले आहेत. दिवसा उन्ह तर रात्री थंडी मागील आठवड्यात परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पाऊस गायब झाला असला तरी रात्रीच्या वेळी थंडी मात्र कायम आहे. तर, नागरिकांना दुपारी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणातील बदलाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. साथीच्या आजाराचा  नागरिकांना सामना करावा लागत आहे.

दोन वर्षांपूर्वी परिसरातील अनेक नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. आता कुठे नागरिकांचे आरोग्य स्थिरावले असताना पुन्हा साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे दिसत आहे.  कोरोना काळात अनेकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली होती. त्यामुळे या बदलत्या वातावरणाचा शरीरावर परिणाम होताना दिसून येत आहे. नागरिकांनी बदलत्या वातावरणात स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. गार पाणी, कोल्ड्रिंक्स, पिणे टाळणे गरजेचे आहे. तसेच, खोकला, सर्दी, ताप जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवून औषधे घ्यावीत, असे डॉ. अनिल गिरी यांनी सांगितले.

घरोघरी वाढले खोकल्याचे रुग्ण
सकाळी थंडी वाजत असून दुपारची तीव्र उष्णता आणि रात्रीचा गारवा याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे सर्दी, खोकला आणि ताप या आजारांचे सर्वांधिक रुग्ण दवाखान्यात येत आहेत. घरोघरी खोकल्याचे प्रमाण मुलांमध्ये अधिक आढळत आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT