सोमेश्वरनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : होळ ते मुरुम (साळोबावस्ती) या रस्त्याचे काम जवळपास चार महिन्यांपासून रखडले आहे. रस्त्यावरील खडी आणि कच उघडी पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. खडीवरून घसरून अपघात होत आहेत. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
होळ ते वडगाव निंबाळकर या रस्त्याचे काम नाबार्डमधून पूर्ण झाले आहे. मात्र, कोऱ्हाळे खुर्द-होळ-मुरुम (साळोबावस्ती) या मार्गाचे काम रखडले आहे. या रस्त्यासाठी अर्थसंकल्पातून निधी मंजूर झाला आहे. साळोबावस्ती ते मुरुम रस्त्यावर फक्त खडी टाकली गेली आहे. पक्का रस्ता करून डांबरीकरण पूर्ण करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम संपल्याने रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. कित्येक दिवसांपासून रस्ता पूर्ण होत नसल्याने स्थानिक वाहनचालकांनी तातडीने नाराजी व्यक्त केली आहे. फलटण आणि बारामती तालुक्यातील प्रवाशांना महत्त्वाचा आणि मधला मार्ग म्हणून हा रस्ता उपयोगी पडतो. अनेक विद्यार्थीही या मार्गाने ये-जा करतात.
त्यामुळे होळ ते साळोबावस्ती या रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्याच महिन्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या मार्गाने प्रवास केला होता. जूनपासून पाऊस सुरू होणार असल्याने पुन्हा रस्त्याच्या कामाला विलंब होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.