आशिष देशमुख
पुणे : भारतीय समुद्री स्थिरांक (आयओडी) सध्या तटस्थ अवस्थेत आहे. मात्र, तो जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सकारात्मक होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या जरी पावसाची उघडीप असली, तरी जुलैअखेर दमदार, तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच, यंदा कमी कालावधीत जास्त पाऊस असाच पावसाचा पॅटर्न राहील, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.
यंदा ‘अल निनो’मुळे पाऊस कमी होणार, अशी भाकिते काही शास्त्रज्ञांनी वर्तविली होती. मात्र, १ ते ९ जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावत या भाकितांना छेद दिला. तसाच आणखी एक अंदाज तज्ज्ञांनी दिला आहे, तो भारतीय समुद्री स्थिरांकावर आधारित आहे. इंडियन ओशियन डायपोल (आयओडी) म्हणजेच भारतीय समुद्री स्थिरांक हा महत्त्वाचा घटक ‘अल निनो’चा प्रभाव कमी करून भारतीय उपखंडात पाऊस देऊ शकतो, असा अंदाज अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी दिला आहे. हा ‘आयओडी’ जुलैअखेर अंशतः, तर ऑगस्टपासून जोरदार सक्रिय होण्याची शक्यता आहे.
सध्या हवेचे दाब १,१०० हेक्टा पास्कल इतके वाढले आहेत. त्यामुळे पाऊस कमी झाला. ते दाब जेव्हा १,००४ ते १,००२ वर येतील तेव्हा पाऊस पडेल. सध्या भारतीय समुद्री स्थिरांक तटस्थ असून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तो अंशतः सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २२ ते ३१ जुलै या कालावधीत दमदार पावसाची शक्यता आहे.
‘आयओडी’ ऑगस्टच्या सुरुवातीपासून जोरदार सक्रिय होणाची शक्यता आहे, त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही चांगला पाऊस होईल. यंदा कमी दिवसांत जास्त पाऊस हा पॅटर्न राहणार आहे. जसा १ ते ९ जुलै या कालावधीत झाला, तसाच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होईल.
जून कोरडा गेला. मात्र, जुलैमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. तो खरा ठरला, सध्या राज्यात हवेचे दाब वाढल्याने पाऊस कमी झाला आहे. ते कमी होताच पाऊस पडण्यास सुरुवात होईल. जुलैअखेर ‘आयओडी’ सक्रिय होऊ शकतो. प्रामुख्याने ऑगस्टमध्ये तो जोरदार सक्रिय होईल. त्यामुळे जुलैअखेर दमदार, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस पडेल.डॉ. रामचंद्र साबळे, कृषी हवामानतज्ज्ञ, पुणे