बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी परिसरातील अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइन नादुरुस्त झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यांवरून वाहत आहे. यामुळे स्वच्छता कामगारांना या रस्त्यांची साफसफाई करताना सांडपाण्यात उभे राहून काम करावे लागत आहे. त्यातच या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत पुरेशी काळजी घेण्यात येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद मार्गावरून वाहणार्या पाण्यामुळे स्वच्छता कामगारांना रस्ता नीट झाडता येत नाही. परिसरातून गोळा केलेला सुका व ओला कचरा ठेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली नाही. त्यामुळे हे कामगार मैलामिश्रित पाण्यात उभे राहून घंटागाड्यांमध्ये कचरा भरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे स्वच्छ संस्थेचे निरीक्षक, महापालिकेचे आरोग्य निरीक्षक आदींचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच या कामगारांना सुरक्षिततेची पुरेशी साधनेही पुरवली जात नाहीत. यामुळे या कामगारांना पोटासाठी आरोग्याची जोखीम पत्करून काम करावे लागत आहे.
'आमचे वय झाले आहे. मुले आम्हाला सांभाळत नाहीत. त्यामुळे घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करावे लागते. मिळणार्या तुटपुंज्या पगारावर आम्ही उपजीविका चालवतो. मात्र, स्वच्छता करताना आमच्या आरोग्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. सुरक्षिततेची पुरेशी साधने आम्हाला पुरवली जात नाहीत. यामुळे विविध आजारांना देखील तोंड द्यावे लागत आहे. मात्र, पोटासाठी काम करावेच लागत आहे,' असे एका कामगाराने नाव न छापण्याच्या आटीवर सांगितले.
स्वामी विवेकानंद रस्त्यावर व्हीआयटी कॉलेज चौकामध्ये बर्याच दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. त्यामुळे स्वच्छता कामगारांना या ठिकाणी अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागत आहे. त्याबाबत ड्रेनेज विभागाला कळवून 'फीडर पॉइंट'वरून कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
– विनोद साबळे, आरोग्य निरीक्षक, महापालिका
स्वामी विवेकानंद रस्त्यावर रिजेंट हॉलशेजारी कचरा 'फीडर पॉइंट' आहे. पदपथावरील या पॉइंटजवळ रस्तादुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे कचरा गोळा करणे व तो गाडीत भरण्यासाठी कामगारांना कसरत करावी लागत आहे. पुढील दोन-चार दिवसांत या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.
– विकास पवार, स्वच्छ समन्वयक