पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरीतील बाजारपेठेत सध्या केरळ हापूसच्या काही पेट्या दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी व देवगड हापूसचे दर चढे असल्याने आणि मागणी कमी असल्याने त्यांच्या पेट्या मात्र विक्रीसाठी आलेल्या नाही. पर्यायाने, रत्नागिरी आणि देवगड हापूसची प्रतीक्षाच आहे. हापूस आंब्याचे पुणे मार्केटयार्डात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आगमन होते. त्यानंतर, हा हापूस पिंपरी बाजारपेठेतही दाखल होतो. मात्र, यंदा मार्च महिना उजाडला तरी अद्याप रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या पेट्या पिंपरी बाजारपेठेत दाखल झालेल्या नाही. सध्या केरळ हापूसच्या काही पेट्या दाखल झाल्या आहेत.
एक हजार ते 1 हजार 600 रुपये डझन दराने हा आंबा विकला जात आहे. येत्या 10 ते 15 तारखेनंतर हापूस आंब्याची बाजारपेठेत आवक सुरू होईल. तसेच, 22 तारखेला गुढीपाडवा आहे. त्यानंतरही आंब्याची आवक वाढेल, अशी माहिती फळ विक्रेते कुमार शिरसाट यांनी दिली. पिंपरीतील फळबाजारामध्ये बदाम आणि लालबाग हा आंबा मात्र विक्रीस आलेला आहे. 100 ते 200 रुपये किलो या दराने बदाम आंबा विकला जात आहे. तर, 160 ते 300 रुपये किलो या दरात लालबाग विकण्यात येत आहे.