मंचर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : कळमोडी धरणाचे पाणी खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांतील शेतीला मिळण्यासाठी आणि सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंब्यासाठी सातगाव पठार भागातील शेतकर्यांचा ओघ वाढला आहे. खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यांतील कोरडवाहू गावांना वरदान ठरणार्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळण्यासाठी व डिंभे धरण हुतात्मा बाबू गेनू सागरातून बोगद्याद्वारे पाणी थेट नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट घालणार्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधव सोमवार (दि.26) पासून उपोषण आंदोलन करत आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या सातगाव पठार भागातील शेतकरी बांधवांनी मुंबई येथील आझाद मैदानात मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला. या वेळी पेठचे सरपंच राम तोडकर यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन केले. आंदोलकांवर खोटे आरोप करणार्या व्यक्तींना जनता माफ करणार नाही, असा इशाराही दिला. शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनील बाणखेले यांनी याप्रसंगी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सरकारने उपोषणकर्त्यांच्या मागण्याची दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी केली. या वेळी युवा सेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रवीण थोरात पाटील, उद्योजक कृष्णा पवळे, बाळकृष्ण गटे, भागा एरंडे, अशोक बाजारे, रवींद्र तोत्रे, गणपत कराळे, विलास घेवडे, संजय पवळे, शरद भोजणे, अरुण एरंडे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.