पुणे

Pune News : थांबा असतानाही बस थांबत नसल्याने घेराव

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  राजुरी येथील बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या बसगाड्या थांबत नाहीत. याबाबत राजुरी येथील ग्रामस्थांनी बुधवारी (दि. 25) बसस्थानकामध्ये जाऊन एसटी अडवून घेराव घातला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी (ता. जुन्नर) हे 15 ते 20 हजार लोकसंख्येचे गाव असून, येथील अनेक ग्रामस्थ नोकरी व्यवसायानिमित्ताने परगावी आहेत. त्यामुळे रात्री येण्यासाठी असलेल्या एसटी बसगाड्या थांबत नाहीत. परिणामी, त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

येथील बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या कुठल्याही बस थांबत नसल्याने माजी सभापती दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने कल्याण आगार, नारायणगाव आगार व शिवाजीनगर आगार प्रमुखांना राजुरी या ठिकाणी बस थांबत नसल्याचे पत्र दिले होते. त्यानंतर वरील तिन्ही आगार प्रमुखांनी येथील बसस्थानकावर पारनेर, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, कल्याण, ठाणे, मुंबई, नारायणगाव आणि राजगुरुनगर या आगाराच्या बसगाड्या या ठिकाणी थांबतील, अशा सूचना संबंधितांना दिल्या होत्या. परंतु, तरीदेखील येथे बस थांबत नसल्याने प्रवाशांच्या वतीने हनुमान देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर औटी, मुक्ताची औटी, रवींद्र गाडगे, संदीप औटी, नामदेव औटी, सुदाम औटी, जिजाभाऊ हाडवळे, पांडुरंग औटी, गणेश हाडवळे, विकास घंगाळे, रखमा रायकर, गंगाराम औटी, स्वप्नील हाडवळे यांच्या नियोजनाखाली बुधवारी सकाळी कल्याण-नगर एसटी राजुरी या ठिकाणी आल्यानंतर ग्रामस्थ व प्रवाशांनी अडवत चालकास विचारणा केली. त्यावर चालकाने यापुढे थांबविल्या जातील, असे सांगितले. यापुढे येथे सर्व एसटी न थांबल्यास रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा कडक इशारा ग्रामस्थांनी दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT