पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून अद्याप महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी आता प्रवेशासाठी शेवटची फेरी राबवली जाणार आहे. 11 ते 13 सप्टेंबरदरम्यान संबंधित फेरी राबविण्यात येणार आहे. राज्यात अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत तब्बल 13 लाखांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेशासाठी अद्यापही साडेआठ लाखांच्या जवळपास जागा रिक्तच राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Pune Latest News)
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 544 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 22 हजार 298 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 45 हजार 244 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 67 हजार 542 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 14 लाख 83 हजार 33 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 11 लाख 56 हजार 582 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर 1 लाख 68 हजार 64 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अशा 13 लाख 24 हजार 646 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता प्रवेशासाठी अद्यापही 6 लाख 65 हजार 716 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 1 लाख 77 हजार 180 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 8 लाख 42 हजार 896 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अकरावी प्रवेशासाठी फेर्या राबवूनही विद्यार्थी प्रवेशाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे यंदा सव्वाआठ लाखांहून अधिक बाके रिकामीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवीन कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी करणे - 11 सप्टेंबर
कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या इच्छेनुसार (व्यवस्थापन, अल्पसंख्याक) कोट्यातील जागा प्रत्यार्पित करणे - 11 सप्टेंबर
प्रवेश क्षमता वाढविणे - 11 सप्टेंबर विशेष फेरीअंतर्गत भरलेल्या अर्जात दुरुस्ती करणे तसेच किमान 10 पसंतीक्रम भरणे - 12 सप्टेंबर विशेष फेरीसाठी प्रवेश जाहीर करणे - 12 सप्टेंबर
विशेष फेरीमध्ये अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत - 12 आणि
13 सप्टेंबर