पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका वाचनासाठी देण्याची सुविधा यंदाच्या परीक्षेपासून रद्द करण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे नीट आकलन होण्यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत गेली काही वर्षे वापरण्यात येत होती.
मात्र, परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच पेपरफुटीच्याही चर्चा होतात. दहावी-बारावीच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असल्याने पालक आणि समाजघटकांचे या परीक्षांकडे लक्ष असते. पेपरफुटीच्या अफवांमुळे राज्य मंडळाची समाजातील प्रतिमा मलीन होते. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी, निकोप आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा यंदापासून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात अकरा वाजता, तर दुपारच्या सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकेचे वाटप सुरू होणार असल्याचे ओक यांनी म्हटले आहे. परीक्षा दालनात ज्या क्रमाने प्रश्नपत्रिकेचे वाटप होईल, त्याच क्रमाने परीक्षेचा कालावधी संपल्यावर लिखित उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांकडून गोळा करण्याच्या सूचना सर्व दालन पर्यवेक्षकांना आणि केंद्र संचालकांमार्फत देण्यात येणार आहेत.
वेळेपूर्वी अर्धा तास उपस्थितीचे बंधन
राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्याबाबत प्रवेशपत्रावरही नमूद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.