pune news
वारकऱ्यांना एक टन पिठलं आणि एक लाख भाकरीची मेजवानी Pudhari photo
पुणे

वारकऱ्यांना एक टन पिठलं आणि एक लाख भाकरीची मेजवानी

पुढारी वृत्तसेवा

यवत (पुणे) : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना भोजनासाठी परंपरेनुसार पिठलं भाकरीचा जोरदार बेत यवतकरांनी बुधवारी आखला आहे. एक टन पिठलं आणि एक लाख भाकरी अशा स्वरूपाची ही मेजवानी असणार आहे.

गेल्या ८० वर्षापासून या ठिकाणी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिठलं भाकरी करण्याची परंपरा यवत (पुणे) ग्रामस्थांनी जोपासली आहे. पालखी सोहळा सायंकाळी यवत गावातील काळ भैरवनाथ मंदिरात मुक्कामी दाखल झाल्यानंतर मंदिर परिसरातच वारकऱ्यांना पिठलं भाकरी वाटप करण्यात येते. या ठिकाणी बुधवारी (दि.३) रोजी सकाळपासूनच ग्रामस्थांची पिठलं भाकरी बनवण्याची लगबग सुरू केली आहे.

मंदिर परिसरात एक टन पिठलं बनवलं जातं तसेच दहा हजाराच्या आसपास भाकरी देखील याच ठिकाणी बनविल्या जातात. तर उर्वरित भाकरी यवत परिसरातील वाड्यावस्त्यांवरील महिला बनवून त्या पालखी सोहळा गावात येण्यापूर्वीच घरातील कुटुंब प्रमुख या ठिकाणी आणून देतात. पिठलं भाकरी बनवण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर युवक देखील सहभागी होतात. सकाळपासूनच कांदा चिरणे, मसाले एकत्र करणे, बेसन भिजवणे यासाठी ग्रामस्थ कष्ट घेताना दिसतात.

लोणी काळभोर ते यवत असा मोठा पल्ला पार करुन आल्यानंतर या ठिकाणचे पिठलं आणि भाकरी खाण्यासाठी वारकरी मंडळी गर्दी करत असतात. वारकऱ्यांच्या बरोबर पालखी सोहळा काळात बंदोबस्ताला असणारे पोलीस अधिकारी कर्मचारी व विविध विभागाचे सरकारी कर्मचारी या ठिकाणी पिठलं- भाकर खाण्यासाठी आवर्जून येत असतात.

या ठिकाणच्या पिठलं भाकरीबद्दल माहिती देताना ग्रामस्थ सांगतात की, एरव्ही आपण घरी बनवलेल्या पिठलं भाकरी पेक्षा या ठिकाणी बनवलेल्या भाकरीची चव खूपच स्वादिष्ट असते. त्यामुळे वारकऱ्यांना वाटप केल्यानंतर ग्रामस्थ देखील या पिठलं- भाकरीचा आस्वाद घेतात. या ठिकाणच्या चवीला कालभैरवनाथ तुकाराम महाराज आणि विठ्ठलाची कृपा असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

SCROLL FOR NEXT