पुणे : पुढारी वृत्तसेवा : कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम, बेशिस्त पीएमपी, एसटी आणि इतर अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, चौकाचा कोंडीमुळे अक्षरश: श्वास गुदमरत आहे. यातून मार्ग काढताना वाहनचालकांना नाकीनऊ येत आहेत.
उड्डाणपुलाच्या कामामुळे बायपास रस्ता जाम…
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कात्रज चौकात उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आणखी किमान वर्षभर हे काम चालणार आहे. सध्या कात्रज चौकातच उड्डाणपुलाचा खांब उभारण्यात येत आहे. या कामामुळे नवले पुलाच्या दिशेने येणार्या वाहनांची कात्रज बायपास रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागत आहेत.
पीएमपीचा बेशिस्त यू टर्न…
स्वारगेटकडून कात्रज चौकात येणार्या पीएमपीच्या बस, सिग्नल न पाहाता यू टर्न घेत आहेत. यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यांना येथून यू टर्न घेण्यास बंदी करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
काय हव्यात सुधारणा ?
कात्रज घाटातून येणारे एसटी चालक कात्रज पोलिस चौकीसमोर रस्त्यातच प्रवाशांना उतरवतात, ते थांबविणे आवश्यक.
उड्डाणपुलाच्या कामामुळे कोंडीत भर पडली आहे. त्यामुळे येथे वाहतूक नियोजनासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज.
कात्रज पोलिस चौकीच्या वरच्या बाजूस वाढलेली विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविणे आवश्यक.
अस्ताव्यस्त रिक्षा लावणार्या रिक्षाचालकांना शिस्त आवश्यक.
अवैध प्रवासी वाहतूक वाहनांची अनधिकृत पार्किंगवर कारवाई.
मुख्य चौकातील
पीएमपी बसथांबा हटविण्याची गरज.