वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत राबविण्यात आलेली पाणी योजना निकृष्ट ठरल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. यामुळे सिंहगड किल्ल्याच्या मोगरवाडी, खामगाव मावळ (ता. हवेली) सह वाड्या-वस्त्यांतील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या परिसरासाठी आता जलजीवन मिशनमधून नवी योजना मंजूर झाली आहे. ती दर्जेदारपणे राबवावी, अशी मागणी टंचाईग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेतून खडकवासला धरणातून थेट पाणी उचलून गडाच्या पायथ्याला असलेल्या मोगरवाडी, खामगाव मावळ व वाड्या-वस्त्यांत नेण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाचे पाइप वापरल्याने व मोटार बंद पडल्याने गेल्या पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे दहा हजारांवर नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मोगरवाडी, माळवाडी, चांदेवाडी येथील रहिवाशांना सार्वजनिक विहिरीतील तसेच कोठरजाई तळ्यातील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. खामगाव मावळच्या सरपंच संतोषी दारवटकर म्हणाल्या, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अडीच कोटी रुपयांची पाणी योजना पाच महिन्यांपासून बंद आहे. जलजीवन मिशन योजनेतून नवीन योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यात लोखंडी पाईप टाकावे. काम दर्जेदार करावे.
पुणे जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. ए. खताळ म्हणाले, जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबविण्यात येणार्या योजनेसाठी उपलब्ध निधीतून आवश्यक ठिकाणी लोखंडी पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत. योजना सुरळीत सुरू राहावी यासाठी स्थानिक कर्मचार्याला प्रशिक्षण दिले जाणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे म्हणाले, मपहिल्या योजनेतील त्रुटी दूर करून नवीन योजना अधिक दर्जेदारपणे राबविण्यात यावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. स्थानिक कार्यकर्ते अनिल दारवटकर म्हणाले, मजलवाहिन्याची दुरुस्ती केली आहे. मात्र, पंपात बिघाड झाला आहे. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू होईल.