पुणे- पंढरपूर- ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर सोलापूर जिल्ह्यातील नातेपुतेजवळील कारूंडे (ता. माळशिरस ) येथे कार व टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. रविवारी (दि.6) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
राजेश अनिल शहा (वय 55, रा. जंक्शन), दुर्गेश शंकर घोरपडे (वय 28, रा. लासुर्णे), कोमल विशाल काळे (वय 32, रा. शिरसटवाडी), शिवराज विशाल काळे (वय 10, रा. शिरसटवाडी), आकाश दादा लोंढे (वय 25, रा. लासुर्णे) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर अश्विनी दुर्गेश घोरपडे या गंभीर जखमी झाल्या आहेत. रविवारी (दि.6) पहाटे पाच वाजता राजेश शहा हे आपल्या कर्मचार्यांसह कारने नातेपुते -फलटण मार्गे सातार्याला कासपठार पाहण्यासाठी निघाले होते. माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्यातील कारूंडे गावच्या हद्दीमध्ये उड्डाणपुलावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विरुद्ध बाजूने जात असताना समोरून भरधाव वेगाने येणार्या टेम्पोने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यात राजेश शहा, दुर्गेश घोरपडे, कोमल काळे, शिवराज काळे, आकाश लोंढे यांचा मृत्यू झाला. तर अश्विनी घोरपडे या गंभीर जखमी झाल्या. याबाबतचे वृत्त समजताच लासुर्णे परिसरावर शोककळा पसरली.