Farmer's  Sucide in bhandara
डांभेविरली येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवन संपविले.  File Photo
पुणे

मुलाचा प्रेमविवाह, सासरच्यांची दमबाजी, अखेर वडिलांनी जीवन संपवले

पुढारी वृत्तसेवा

केडगाव : प्रेमविवाह केलेल्या मुलाच्या सासरच्यांनी दमबाजी केल्याने वडिलांनी गळापास घेऊन जीवन संपवल्याची घटना बिरोबावाडी येथे घडली आहे. अनिल सोपाना गावडे (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी (दि.३) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुलगा विवेक अनिल गावडे याच्या फिर्यादीवरून उत्तम आबा चौरे, ज्योती उत्तम चौरे, संजय आबा चौरे, विद्याधर हौशीराम पोमने या चौघांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

विवेक गावडे याने दिलेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०२४ ला गावातील एका कुटुंबातील मुलीशी त्याने प्रेमविवाह केला होता. पाटस पोलिसांत ते १८ एप्रिल रोजी हजर झाले होते. तेव्हापासून मुलीच्या नातेवाईकांकडून त्यांना त्रास सुरू होता. याबाबत पाटस पोलिसांना वारंवार भेटून सांगितले होते. यावर उपाय करण्याऐवजी 'तुला आम्ही राखत बसू का' अशी दमबाजी त्याला करण्यात येऊन याकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. पत्नीच्या नातेवाईकांकडून मला आणि माझ्या परिवाराला सतत त्रास सुरू होता. मला आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. वडीलांना हा त्रास सहन झाला नसल्याने त्यांच्याच त्रासाने त्यांनी जीवन संपवल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे.

साहेब, गरिबाला वाली नाय... आम्हाला न्याय द्या!

अनिल गावडे यांनी राहत्या घराजवळ आंब्याच्या झाडाला बुधवारी (दि. ३) सायंकाळी गळापास घेऊन जीवन संपवले. ३ जुलै रोजी सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत त्यांच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी या घटनेबाबात संशय व्यक्त करून मृतदेहासह पाटस पोलीसचौकी गाठली. तेथे तीन तास पोलीस आणि गावडे यांच्या नातेवाईकांमध्ये वादावादी झाली. गावातील दोन व्यक्ती आणि पाटस पोलिसांमुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, असा आरोप यावेळी गावडे यांचे नातेवाईक करत होते. 'गरिबाला वाली नाय साहेब आम्हाला न्याय मिळाला पाहीजे. पोलिसांनी याआधी आमच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले असते, तर आज ही वेळ आमच्यावर आली नसती. आमच्या घरातील कर्ता व्यक्ती गेला आहे, असा आक्रोश पाटस पोलिसांपुढे एक तासाहून अधिकवेळ मृताच्या नातेवाईकांचा सुरू होता.

SCROLL FOR NEXT