दिवे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात शेतकर्यांचा नगदी पिके घेण्याकडे कल असतो. यात टोमॅटो, पावटा, घेवडा, वाटाणा आदी पिके शेतकरी घेतात. सध्या वाटाणा हंगाम अंतिम टप्प्यात आहे, तर टोमॅटो आणि फ्लॉवरचा हंगाम सुरू आहे. मात्र, बाजारात याची विक्री कवडीमोल भावाने होत आहे. त्यात शेतकर्यांचा उत्पादन खर्चसुध्दा निघत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी मेंढ्यांना टोमॅटोत चराईसाठी सोडणे सुरू केले आहे.
दिवे येथील गोकुळ झेंडे यांनी आपल्या शेतात 20 गुंठे क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. टोमॅटो पिकासाठी त्यांनी 40 हजार रुपये भांडवली खर्च केला. सध्या टोमॅटो हंगाम सुरू आहे. मात्र, त्याची कवडीमोल भावाने विक्री होत आहे. त्यांनी खते, औषधे आदी खर्च करून टोमॅटो जोमदार आणली; परंतु टोमॅटोची अवघ्या 7 ते 8 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याने पिकात मेंढ्या सोडण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहिला नव्हता. त्यातच ढगाळ वातावरणामुळे टोमॅटोवर माशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागडी औषध फवारणी करूनसुद्धा पीक हाती लागत नाही. त्यामुळे त्यांनी लालबुंद टोमॅटोच्या फडात अक्षरशः मेंढ्या सोडल्या. दुसरीकडे सध्या उन्हाळा वाढल्याने मेंढपाळांनादेखील चार्याची कमतरता भासत असताना चारा उपलब्ध झाल्याने मेंढपाळ खूश झाले आहेत.