पुणे; पुढारी वृत्तसेवा: दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरीला येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आत्तापर्यंत 77 हजार 698 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांत आपले प्रवेश निश्चित केले असून, प्रवेशासाठी अद्यापही 34 हजार 52 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रवेशासाठी तीन नियमित व तीन विशेष प्रवेश फेर्यांचे आयोजन करण्यात आले. तरीदेखील अजूनही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरी सुरू करण्यात आली. सुरुवातीला संबंधित फेरीला 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. परंतु, विद्यार्थ्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत संबंधित फेरी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना संध्याकाळी 7 ते सकाळी 9 दरम्यान अर्ज करता येईल. तर, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 दरम्यान प्रवेश घेता येईल. प्रवेशासाठी निवड होऊनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयासाठी पूर्ण फेरीदरम्यान प्रतिबंधित केले जाईल. नवीन विद्यार्थी नोंदणी, नवीन अर्ज भाग एक भरणे आणि त्यात बदल करण्यासाठी अर्ज अनलॉक करणे 4 ऑक्टोबरपासून बंद होईल.
ही फेरी 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरू राहील. दैनंदिन दिनचर्या शालेय कामकाजाच्या दिवशी चालू राहील. सुट्टीचे दिवस केवळ अर्ज करण्यासाठी वापरले जातील. कोटा आणि द्विलक्ष्यी प्रवेश प्रक्रियादेखील नेहमीप्रमाणे सुरू असतील. दुबार प्रवेश घेणारे अथवा जाणीवपूर्वक जागा अडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल, असे उपसंचालक कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
एकूण महाविद्यालये- 318
एकूण प्रवेशक्षमता – 111750
एकूण नोंदणी – 107790
कोटा प्रवेशक्षमता – 15561
कोटांतर्गत प्रवेश – 10029
कॅप प्रवेशक्षमता – 96189
कॅप अंतर्गत अर्ज -76049
एकूण प्रवेश – 77698
रिक्त जागा – 34052